अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत. असे असताना आता राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजारात टोमॅटोची आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे. 80 रुपयांवरुन टोमॅटोचे दर आता 25 ते 30 रुपयांवर आले आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या टोमॅटोची निर्यातही मंदावली आहे. दहा दिवसांत दर जवळपास निम्म्यावर आले आहेत. काही दिवसांपूर्वी टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आनंदात होते.
शेजारील राज्य कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून राज्यात टोमॅटोची आवक होत आहे. त्यामुळं दर घसरत आहेत. यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. हे दर आणखी घसरण्याची शक्यता देखील विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. नाशिक जिल्ह्यात कांद्यासाठी लासलगाव बाजारपेठ सर्वात महत्वाची समजली जाते.
त्याचप्रमाणे अलीकडच्या वर्षात गिरणारे बाजारपेठ भाजीपाला त्यातही टोमॅटो पिकासाठी महत्वाची मानली जाते. मात्र त्याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर हे दर घसरले आहेत. यंदा नाशिक भागातील टोमॅटो उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. मात्र त्यांना अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. दरम्यान, अगोदरच अवकाळी पावसामुळे संकटात असलेला टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याने अजूनच संकटात सापडला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर दुहेरी संकट ओढवले गेले आहे. यामुळे आता शेतकरी अवकाळीच्या मदतीची मागणी करत आहेत.