बैलगाडा शर्यतीबाबत न्यायालयाने बंदीचा निर्णय उठवला आणि त्यानंतर अनेक ठिकाणी शर्यतींचे आयोजन करण्यात आले असे असताना त्याला अनेक नियम आणि अटी देखील लादण्यात आल्या आहेत. असे असताना औरंगाबादच्या पळशी परिसरात नियमबाह्य स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे याची माहिती मिळताच चिकलठाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी गेले. पोलिसांनी आयोजकांकडे परवानगीबाबत विचारणा केली. मात्र आयोजकांकडे परवानगी नसल्याने पोलिसांनी स्पर्धा थांबवल्या. त्यामुळे आयोजक आणि पोलिसात हुज्जत झाली. दरम्यान परस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांनी स्पर्धक व बघण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना सौम्य लाठीचार्ज करत तेथून हुसकावून लावले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शहर जवळपासच्या खेड्यांतील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. तसेच मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील स्पर्धक देखील सहभागी झाले होते. परंतु आयोजनासाठी रीतसर परवानगी घेतली नव्हती. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी यावर कारवाई केली.
पोलिसांनी आयोजकांना स्पर्धा बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी आयोजक आणि पोलिसात शाब्दिक चकमक झाली. पोलिसांच्या आवाहनानंतर शंकरपट बंद करण्याऐवजी आयोजकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यामुळे हा वाद वाढतच गेला. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळेअनेकांची पळापळ झाली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्पर्धा भरवण्याबाबतची बंदी न्यायालयाने उठवली आहे. मात्र असे असतांना देखील यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घ्यावी लागते. मात्र पळशी येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेसाठी परवनागी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे चिखलठाणा पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे