कोरोनानंतर राज्यात जनावरांना लम्पी स्कीन हा आजार झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांचा मृत्यू झाला. यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला. असे असताना खबरदारी म्हणून गेल्या अडीच महिन्यांपासून जनावरांचे बाजार बंद आहेत.असे असताना बंद असलेले जनावरांचे बाजार येत्या चार दिवसांत सुरू होणार आहेत. यामुळे आता लाखोंची उलाढाल पुन्हा एकदा सुरू होणार आहे. सध्या लम्पी स्कीन आजाराचे प्रमाण आटोक्यात येत आहे.तसेच बहुतांश जनावरांना लसीकरण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर बाजाराला परवानगी देण्यात येणार आहे. या बाबतचे परिपत्रक काढण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विधी व न्याय विभागाला पाठवले आहे.
यावर दोन दिवसांमध्ये निर्णय होणार आहे. जनावरांचे आठवडी आणि जत्रा- यात्रांमधील बाजार बंद करण्यात आले होते. राज्यात आतापर्यंत १४ हजार ६१२ गोवंशाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, मृत जनावरांना भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. गायीसाठी ३०, बैलासाठी २५, तर वासरांचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपयांची भरपाई दिले जात होते. लसीकरण देखील मोठ्या प्रमाणावर झाले आहे. ८ सप्टेंबरपासून जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून खरेदी- विक्रीचे व्यवहार थंडावले होते. यामुळे याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.संपूर्ण वाहतूक बंदी असल्याने म्हशींच्या खरेदी विक्रीला फटका बसला होता. शेतकऱ्यांना दुधाळ म्हशी खरेदी करण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. यामुळे हे बाजार कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पशुसंवर्धन आयुक्तालयाकडे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर निवेदने येत होती.