सध्या लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जनावरे दगावत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र याची शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही दिली जात आहे. आतापर्यंत किती रक्कम देण्यात आली? याविषयी माहिती जाणून घेऊया. आजपर्यंत राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे पशू मृत्युमुखी पडले, अशा 2,552 पशुपालकांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी रु. 6.67 कोटी रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, “लम्पी चर्मरोगाच्या विषाणूच्या जनुकीय परीक्षणांतर्गत जिनोम क्रमवारिता तपासणीसाठी आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे पाठविण्यात आले. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे.
तसेच पुढे बोलताना म्हणाले लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमुने 7 विभागांमधून प्रतिविभाग दोन गावातील पशुधनातील लसीकरणापूर्वीचे नमुने व लसीकरणानंतरचे 7, 14, 21 व 28 दिवसांचे रक्तजल नमुने संकलित करुन ते बेंगळूरु येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोगमाहिती संस्था येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांचे निष्कर्ष देखील नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे. राज्यामध्ये 29 ऑक्टोबर 2022 अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3176 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 1,61,609 बाधित पशुधनापैकी एकूण 1,05,607 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आजअखेर एकूण 140.97 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.